खेटायचं ठरवलंय तर खेटायचंच’; नाशिकमध्ये मनोज जरांगेंची तोफ धडाडली
नाशिक प्रतिनिधी
जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी इगतपुरी येथील सभेतून आज पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता जे व्हायचं ते होऊ द्या, खेटायचं ठरवलंय तर खेटायचंच, पण, या सगळ्या टोळीच्या लक्षात आलं की, मराठा ओबीसीच्या आरक्षणात गेला आहे. त्यामुळे दंगली करायच्या यांचा कट असू शकतो, पण आपल्याला संयम ठेवायचं आहे. यांचा कट यशस्वी करू द्यायचा नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत शांतता ठेवायची असल्याचे” जरांगे म्हणाले. छगन भुजबळ म्हणतो आमच्यात येऊ नको, मग आम्हो कुठे जायचं, सगळ तू एकटाच खात आहे. घटनेच्या पदावर बसलेला कायदा पायखाली तुडवतोय. दंगली होतील असे वक्तव्य करू लागला आहे. भुजबळ यांना व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता, त्यांच्या विचाराला विरोध होता. मात्र, आता त्यांना व्यक्ती म्हणून देखील आमचा विरोध असणार आहे. आता सुट्टी नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणजेच मिळणारच आहे. तू कितीही प्रयत्न केले तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहेच, असे जरांगे म्हणाले आहे.
मराठ्यांच्या जीवावर सत्ता भोगली
तुम्हाला ओबीसी बांधवांची आणि महात्मा फुलेंची एवढी आस्था आहे. तर, मग तुमच्या एकही कॉलेजला सावित्रीबाई फुले यांचे नाव का दिलं नाही. तुम्ही, लोकांना काय तत्त्वज्ञान शिकवणार, माझ्यासारख्या सामान्य
घरातील लेकरावर नाही ते आरोप करतायत. ३० ते ३५ वर्ष मराठ्यांच्या जीवावर सत्ता भोगली. मराठ्यांच्या उपकाराची परतफेड तुम्ही अशा प्रकारे करत आहात का?, तुम्ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही एकटेच ५० ते ५५ टक्के मराठे आहोत. फक्त आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत आहोत, आमच्या वाट्याला जाऊ नका. यांच्यावर वेळीच बंधन घाला अशी सरकारला विनंती आहे, असेही जरांगे म्हणाले.
माझ्या नादी लागू नको भाऊ…
भुजबळ यांचे वय झाले असल्याने त्यांना काहीच सुधरत नाही. त्याला माझं सर्व काही माहित असेल तर मला देखील त्याचं सर्व काही माहित आहे. तू कोणाची जमीन खाल्ली? कोणाचे बंगले हडपले? मला शांत राहू दे, उगाच डिवचू नको. तुझं देखील सगळं मला माहिती आहे. आमचा आग्यामोहळ खूप डेंजर आहे. माझ्या नादाला लागू नको. एक सभा घेतली, पण माझ्या मुबईत जाईपर्यंत त्यातील अर्धे फुटले असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.