संगमनेर प्रतिनिधी
येथील समाजिक कार्यकर्ते व भारतीय जनतापक्षाचे युवानेते अमोल खताळ यांची संगमनेर संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मोठ्या कालावधीनंतर या योजनेला अध्यक्ष मिळाल्यामुळे ज्येष्ठ नागरीकांच्या प्रलंबीत कामांना वेग येणार आहे. ज्येष्ठ नागरीकांसाठी राज्य शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या योजनांचे आर्थिक साह्य संजय गांधी निराधार आनुदान योजना समिती मार्फत मंजुर केले जाते. समाजातील विविध माता – भगिनी व ज्येष्ठ नागरीकांना या योजनेतून लाभ दिला जातो. या समितीचे अध्यक्ष म्हणून अमोल खताळ यांची पालकमंत्र्यांच्या शिफारशीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नियुक्ती केली आहे. या समितीचे शासकीय प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी, नगरपालीका मुख्याधिकारी, नायब तहसीलदार हे असतात. अमोल खताळ यांनी राजकीय व सामाजिक कार्य करत असतांना अनेक प्रश्नावर समर्थपणे आवाज उठवला आहे. माहिती अधिकाराचा योग्य वापर करून सर्व सामान्यांची अनेक प्रलंबीत कामे मार्गी लावली आहे. त्यांच्या या निवडीमुळे वरील योजनांचा समाजातील, तळागळातील लोकांना नक्कीच फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल त्यांचे भाजपपक्षासह सर्वच स्थरातून अभिनंदन केले जात असून या निवडीमुळे संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबीत कामांना आता गती मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या अध्यक्षपदी अमोल खताळ यांची वर्णी लागणार अशी अटकळ लावली जात होती ती अखेर खरी ठरली.माजी पाटबंधारे मंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अभ्यासू व्यक्तिमत्व बी.जे खताळ पाटील यांचा वारसा लाभलेले अमोल खताळ या योजनेला नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.