दीडशे कोटी भारतीयां बरोबर मला सुद्धा भारतीय संघ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हरल्याचे दुःख आहे. खरं तर स्पर्धेच्या सुरुवाती पासूनच भारतीय संघ ही स्पर्धा जिंकण्यास सर्वाधिक सक्षम व लायक होता आणि या सर्वात प्रबळ दावेदार असलेला संघाचा खेळ ही तसा बहरला सुद्धा होता, त्यामुळेच या परभवाचे दुःख अधिक जाणवते आहे. आम्हा भारतीयांच्या क्रिकेट बद्दलच्या भावना किती संवेदनशील आहे हे सर्वांना ठाऊकच आहे मात्र या निमित्ताने दर वेळेस होत असलेला सार्वजनिक अंधश्रद्धांचा बाजार आणि त्याचे वाढते स्तोम हा गहन चिंतेचा विषय आहे. अलिकडे तर मेन स्ट्रीम मिडीया मधून राष्ट्रीय स्तरावर सर्रास होत असलेला या सामुदाहीक मुर्खपणातील चढाओढ आणि त्या प्रति एकूण भारतीय समाजाची सोईस्कर डोळेझाक अत्यंत क्लेशदायक आहे. एकी कडे भारतीय संविधान विज्ञाननिष्ठ समाज घडविण्याचे लक्ष सर्वांनापूढे ठेवते या संबंधात ज्या मिडिया ची जबाबदारी सर्वाधिक आहे तोच मिडिया त्याच्या बरोबर उलट करीत असताना सरकार तर सोडाच पण समाजातून कोणतीही तीव्र प्रतिक्रिया उमटू नये हे निराशाजनक आहे. निदान समाजातील प्रज्ञावान जागरूक विचारवंताचे असे किंमकर्तव्य मुढ होऊन उघड्या डोळ्यांनी पाहत राहणे न केवळ आत्मघातकी आहे तर भारतीय समाजाच्या अंधारमय भवितव्य सुचक ही आहे.
सर्व क्रिकेट प्रेमीसाठी क्रिकेट एक खेळ असून त्याच्याशी जूळलेल्या त्यांच्या निस्सीम भावना जरी निर्मळ असल्या तरी क्रिकेट आज केवळ खेळ राहिलेला नाही. आज क्रिकेट कडे वाहत असलेला प्रचंड पैसाचा ओघ, खेळाडूंचे ब्रँड व्हॅल्यू, पुरस्कृत -अपुरस्कृत सट्टेबाजी, वाहिन्याचे टीआरपी, जाहिराती, राजकारण्यांचे हस्तक्षेप इत्यादींनी क्रिकेट आणि त्यांच्या प्रेक्षका मध्ये असलेले संबंध सुद्धा आता पार बदलून टाकले आहे. अलिकडे भारतात तर राजकीय पक्ष पुरस्कृत सामाजिक द्वेष क्रिकेट प्रेमींमधून उफाळून येऊन खेळाडूंच्या जाती-धर्मावर घसरताना दिसतो. तर दुसर्या बाजूला व्यापारी बुद्धीच्या कर्मदरिद्री नेते ज्यानां देशाच्या आर्थिक सामाजिक, शैक्षणिक भवितव्या पेक्षाही क्रिकेटच्या या प्रचंड लोकप्रियतेच्या लोकभावनेवर आपले राजकीय कारकीर्द चमकवण्या साठी उपयोग करून घेताना दिसतात तेव्हा आश्चर्य होतं नाही.
पैसा ग्लॅमर असलेल्या या लाभदायक क्षेत्राला व्यापारी मुल्य प्राप्त होऊन अनेक अनिष्ट समाजविघातक तत्वांचा शिरकाव होणे क्रमप्राप्त आहे मात्र क्रिकेट प्रेमी म्हणून प्रेक्षकांच्या भावनेशी जो खेळ खेळला जातो तो आता धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे हे ही तितकेच खरे आहे.
टीआरपी व भरपूर नफ्याच्या समीकरणात अशा प्रसंगी इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडिया तसेच सोशल मीडिया एकूणच मेन स्ट्रीम मिडीया मधून अंधश्रद्धेचा जो खुल्लम खुला उच्छाद मांडला आहे तो तर अत्यंत दुर्दैवी आहेच मात्र त्याही पेक्षा दुर्दैवी समाजाची मुक संमती, वाढती स्विकार्यता आणि सहिष्णूता (षंढपणा) अत्यंत घातक आहे.
माणसाने आपल्या (परफॉर्मन्स) कर्तृत्ववार व आत्मविश्वासावर विश्वास ठेवावा भविष्यवाणीवर नाही याचे साधे भानही मिडिया भारतीय समाजाला होऊ देत नाही. संपूर्ण भारतीय दैववादी बनवण्याची जणू सुपारी घेतल्यप्रमाने मिडिया आज धुमाकूळ घालत आहे. अशा वेळी समाजप्रबोधन, समाज जागृती, वैचारिक विज्ञाननिष्ठ पिढी कोणी घडवायची यांची गंभीर दखल समाजातील प्रबुद्ध लोकांनी करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण देशात भारत जिंकावा म्हणून महाआरत्या, होम हवन करने, मज्जीतीमध्ये चादर चढवणे, चर्चमध्ये कॅण्डल लावणे, कुंडल्या काढून न्युज चॅनल्स वर दावा करने सगळं व्यर्थ गेले. तरी सुद्धा त्या पुजारी व भविषवेत्तांची विश्वसनीयता उपयोगिता व उत्तरदायित्वा (जबाबदारी) वर कोणी प्रश्न विचारत नाही या सामुदायिक बेइमानीचे आश्चर्य वाटत. अशा सामुदायिकपणे या सर्रास बौद्धिक अप्रामाणिकताच खर्या अर्थाने भारतीय सामाजाचे चारित्र घडवत असते.
अन्यथा जो संघ ज्या दिवशी चांगला खेळतो तो जिंकतो. ऑस्ट्रेलियन संघ चांगले खेळले म्हणून ते जिंकले हे इतक साधी सोपी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सहज खेळ भावना रुजवणे कठीण नाही.
नाही तरी “भविष्यवाणी चे वेड मुर्खांना शोभते!”- हे संत तुकोबाने अर्जित केलेल शहाणपण आम्ही पुस्तकात गाडून ठेवलेलं आहेच.
डॉ. जयंत नंदागवळी