नंदुरबार प्रतिनिधी
एक मुखी श्री गुरुदत्त आणि घोडेबाजार यासाठी प्रसिद्ध असलेल्या तापी काठावरील सारंगखेडा यात्रेला आज राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. जिथे जातील तिथे आपल्या उमदेपणाची भाषणातून अथवा कृतीतून छाप सोडण्यासाठी प्रसिद्ध असलेले मंत्री गिरीश महाजन यांना घोडेबाजार पाहत असताना घोड्यावर बसून रपेट मारण्याचा मोह झाला नसता तरच नवल घडले असते. स्पर्धेसाठी आलेल्या घोड्यांची पाहणी करताना त्यांनी घोड्यावर काही मिनिट रपेट मारली तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.ते आज सारंगखेडा यात्रेत सुरू असलेल्या चेतक फेस्टीवल मध्ये बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार रावल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टीवलचे मुख्य प्रवर्तक जयपाल रावळ, जि.प.सदस्य अभिजित पाटील दोंडाईचा शहराच्या माजी नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उगले शहाद्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, देवा रावल, कामराज निकम, महावीरसिंह रावलं, देविदास बोरसे,धनंजय मंगळे,प्रभाकर पाटील, महेंद्र गिरासे, निखिल राजपूत आदि उपस्थित होते. हजारो यात्रा आणि त्यानिमित्ताने होणारे महोत्सव देशभर होत असतात, परंतु सारंगखेड्याची यात्रा अन् चेतक महोत्सव हा देशातला आगळावेगळा स्वरूपाचा आनंद सोहळा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. या यात्रेचा संपर्क खांदेशवासीयांना अभिमान असल्याचे सांगून ते म्हणाले, अलिकडे अश्व पाळणे आणि बाळगणे हा उंची छंद झाला असून पूर्वी युद्धात घोड्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत होता अलिकडे अश्व हे संरक्षण दलात व पोलीस दलात परेडसाठी वापरले जातात. सारंगखेड्याच्या यात्रेला मोठा ऐतिहासिक आणि प्राचिन वारसा लाभला असून केवळ अश्व महोत्सवच नाही तर या यात्रेच्या निमित्ताने होणारा पशुंचा बाजार आणि सुक्या मेव्याचा बाजारही वैशिष्ट्यपूर्ण असतो. जुन्या काळात अफगाणिस्थानातूनही येथे अश्व, सुका मेवा विक्री आणि प्रदर्शनासाठी येत असे. चेतक फेस्टीवल च्या रूपाने तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला ग्लोबल करण्यासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. ही यात्रा येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.