सागर मोर/ वणी
कधी नव्हे ते इतकं मोठं दुष्काळाचं संकट शेतकऱ्यांवर आले आहे. आठ महिने दुष्काळाला तोंड देत होतो आता अवकाळी पावसाने सगळे नष्ट केले आहे. शेतकरी दारात आल्याशिवाय त्याला काहीच द्यायचे नाही हे सरकारचे धोरण आहे. म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मागणी केल्यानंतर फक्त राज्यातील काही भागात या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.आता अवकाळी पावसाने शेतकरी पूर्णत्व उध्वस्त झाला आहे.शेतीचे दुप्पट उत्पन्न देण्याचे आश्वासन ह्या सरकारने दिले मात्र आज आहे त्या परिस्थितीत जगण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करावी असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगत शेतकऱ्यांचे प्रश्नावर या अधिवेशनात सरकारवर दबाव आणू असे जयंत पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरीत रणशिंग फुंकले असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा काढला.
दिंडोरी येथील कादवा पेट्रोल पंप येथून राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेसह आमदार सुनील भुसारा,दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील,जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,गोकुळ पिंगळे,गजानन शेलार आदी सर्व नेते ट्रॅक्टर वर स्वार होत भव्य मोर्चा काढण्यात आला.जयंत पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत अग्रभागी होते.कर्जमाफी झालीच पाहिजे,नुकसान भरपाई द्या.भाजप सरकारचा धिक्कार असो. शरद पवारांचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा अश्या घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर संस्कृती लोंस येथे मोर्चाचे विसर्जन होत सभा झाली. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होतो त्यावेळी शेतकरी कुऱ्हाडीने द्राक्षाची झाडे तोडत होता. तीन – साडे तीन लाख खर्च करून जर एक रुपयाही मिळणार नसेल तर नको हे पीक असे ही शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. परिस्थितीत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पूनर्गठन केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे धोरण आखले पाहिजे. या सरकारने अर्धवट दुष्काळ जाहीर केला आहे. काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असं सरकार म्हणतंय. जिथं दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे तिथं शेतकऱ्यांना वीजबिल माफ केले जाणार का? विद्यार्थ्यांना फी माफ केली जाणार का? सरकारने कोणत्याही नियम व अटी न ठेवता सरसकट दुष्काळ जाहीर करावा व सर्वांना सर्व सवलती द्याव्यात ही आमची मागणी आहे. नाशिक जिल्ह्य़ात दुधाला २७ रुपये भाव दिला जातो. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? कर्नाटक सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रु प्रती लिटर अनुदान देतं पण आपल्या शेतकऱ्यांना कोणतंही अनुदान दिले जात नाही. अमोलचे दुध विकण्यासाठी व्यवस्था आहे, कर्नाटकचे नंदिनी दूध विकण्याची व्यवस्था आहे पण आपल्या महाराष्ट्रात आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांना भाव दिला जात नाही. ही शोकांकिता आहे सुरगाणा तालुक्यातील छोटी धरणे, वळण बंधारे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे येथील आदिवासी शेतकऱ्यांना मदत होईल मी शब्द ही दिला होता पण आमचे सरकार गेले. पण आताचे सरकार त्यावर काम करताना दिसत नाही. सर्व कामे ठप्प पडली आहे. कांदा उत्पादक शेतकरी या भागाचा महत्त्वाचा घटक आहे. पण याच कांद्यावर या सरकारने ४०% निर्यात शुल्क लावले आहे. कांदा बाहेर पाठवता येत नाही आणि त्यामुळे कांदा इथेच सडतो. पिकविमा कंपन्या काही कारणे सांगून परतावा देत नाही. महाराष्ट्रात फसव्या पिकविम्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. कृषिमंत्री म्हणाले होते की दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना पिकविम्याची अग्रिम रक्कम मिळेल. शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर दिवाळी साजरी करणार नाही. यांची दिवाळी जोरात झाली पण आमच्या बळीराजाला पैसे मिळाले नाही. त्यामुळे या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही. मोर्चा आणला पण हा लढा इथेच थांबणार नाही. आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सर्व प्रश्न लावून धरणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले . यावेळी राष्ट्रवादी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड,आमदार सुनील भुसारा, माजी आमदार शिरीष कोतवाल,नितीन भोसले,साहेबराव पाटील,तालुकाध्यक्ष भास्कर भगरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पाटील यांची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण,दीपिका चव्हाण, गोकुळ पिंगळे,तिलोत्तमा पाटील,मविप्र संचालक प्रवीण जाधव,राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,जिल्हाध्यक्ष शाम हिरे,शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ, माकप चे इंद्रजित गावित, कादवा चे व्हा. चेअरमन शिवाजी बस्ते,सर्व संचालक,राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संगीता ढगे तालुकाध्यक्ष शैला उफाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कादवा चे संचालक बाळासाहेब जाधव यांनी जयंत पाटील यांचे स्वागत केले. आभार दिंडोरी शहराध्यक्ष नरेश देशमुख यांनी मानले. सभेनंतर जयंत पाटील यांनी शेतकऱ्यानं समवेत जेवणाचा आस्वाद घेतला.
अजित पवार गटावर नाव न घेता टीका
घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही अजित दादांना टोला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध उभे रहा. ज्याच्यावर अन्याय झाला त्या मागे जा म्हणून शिकवण दिली आहे पण काहीजण सत्तेत गेले अन ते पंचतारांकित हॉटेल मध्ये बैठका घेत आहे तर आम्ही शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना भेटून जाणून घेत आहोत. आर्थिक तिजोरी तुमच्याकडे कृषिमंत्री पद तुमच्याकडे मग का शेतकऱ्यासाठी तिजोरी मोकळी करत नाही असे अप्रत्यक्ष अजित दादांवर टीका करतानाच कुटुंबातील काही गोष्टी चर्चा कुटुंबात ठेवायच्या असतात त्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही असा टोला अजित दादा पवार यांनी काल कर्जत येथे पक्षांतर्गत चर्च बाबत केल्या गौप्य स्फोटाचे पार्श्वभूमीवर बोलताना पवार यांना लगावला.या सरकार मध्ये एकवाक्यता नाही मुख्यमंत्री वेगळे बोलतात तर यांचे मंत्री वेगळेच बोलतात.मुख्यमंत्र्यांनी मराठा ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
नरहरी झिरवाळ यांचे बाबत चुप्पी
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अजित दादा पवार यांचेसोबत गेले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरीत काय रणनीती करणार झिरवाळ यांचेबाबत काय वक्तव्य करणार याची उत्कंठा होती मात्र जयंत पाटील यांनी झिरवाळ यांचे बाबत कोणतेही वक्तव्य न करता केवळ केंद्र व राज्य शासनाचे कारभारावर टीका केली.