सुरगाणा प्रतिनिधी
तालुक्यातील श्रीभूवन येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकनियुक्त सरपंच सुशीला गायकवाड यांच्या प्रयत्नातून आठवडे बाजार भरला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. येथील स्थानिकांना भाजीपाल्यासह इतर वस्तू आणण्यासाठी १५ ते २० किलोमीटर दूर जावे लागत होते. त्यानंतर आता त्रास आणि वेळ वाचणार असल्याने भाजीपाला विक्रेत्यांसह स्थानिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. गावात आठवडे बाजार भरल्यानंतर परिसरातील भाजीपाला उत्पादक किराणा, भेळभत्ता विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती. तसेच श्रीभूवन येथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरणार असल्याने स्थानिकांसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सुखकारक ठरणार आहे. तर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठवडे बाजाराची सुरुवात केल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आठवडे बाजारनिमित्त लोकनियुक्त सरपंच सुशीला गायकवाड, उपसरपंच विजय देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझ्या प्रयत्नांना प्रतिसाद देत सर्व ग्रामस्थ व भाजीपाला विक्रेते आल्याने बाजार मोठ्या प्रमाणात भरला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.
सुशीला गायकवाड, सरपंच, श्रीभूवन