प्रशांत हिरे
एक वर्षांच्या कार्यकाळात धुळ्याच्या पोलीस अधिक्षकांचे काम व्यापक समाजहितासाठी पोषक आहे. मग दुखावले कोण? जुगार चालविणारे किंग आणि त्यांचा राजाश्रय ? अवैध मद्य तस्कर आणि त्यांना पाठबळ देणारे पुढारी ? गुटखा तस्कर आणि त्यांच्या कमाईवर अलिशान गाड्यांच्या कर्जाचे बँक हप्ते भरणारे खादीधारी? की गाईच्या रक्तावर आपले संसार थाटणारे कथित प्रतिगामी पुरोगामीत्वाची शाल पांघरणारे पांढरे बगळे ? असा सवाल सामान्य जनतेला छळत आहे.संजय बारकुंड जिल्ह्यासाठी वर्षा दोन वर्षाचे पाहूणे आहेत. आज नाही तर उद्या ते जाणार आहेत, मात्र अशा प्रकारच्या सुड उगविणाऱ्या बदलीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होते. नितीधैर्य खचते, संजय बारकुंड यांचे उत्तराधिकारी म्हणून कधीतरी कुणीतरी येणार आहे त्या अधिकाऱ्यांच्या मनावर या बदलीचा काय परिणाम होईल, मुक्तपणे तो अधिकारी काम करू शकेल का?
धुळ्याचे पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांची कार्यकाळ पूर्ण होण्याअधी झालेल्या बदलीने समाज माध्यमांसह प्रसार माध्यमांची मोठी जागा व्यापली आहे. खरेतर प्रशासनात कर्तव्य करण्याची जबाबदारी स्वीकाराली म्हणजे एका विशिष्ट कालावधीच्या टप्प्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली क्रमप्राप्त आहे. हे वास्तव शासकीय नोकरदारांनी स्वीकारलेले असते. या बदली प्रक्रीयेविषयी सहसा कुणी कुरबूर करीत नाही. मात्र शासनाच्या धोरणांप्रमाणे निश्चित केलेला कालावधी पूर्ण होणे गृहीत धरलेले असते नव्हे तो नियमच आहे, नियमाला अपवाद असतो.तसा अपवाद बदलीच्या प्रक्रीयेतही अनेकदा वापरला जातो, एखादा अधिकारी कामचुकारपणा करीत असेल, त्या अधिकाऱ्याच्या कामकाज शैलीचा फटका व्यापक जनहिताला बसून सामाजिक हित बाधीत होत असेल, शासनाच्या धोरणांची पायमल्ली होत असेल, शासकिय निधीचा अपव्यय केल्याचा ठपका ठेवला गेला असेल, एखाद्या अधिकाऱ्याविषयी गंभीर तक्रारी असतील तर अशा अधिकाऱ्याचा कार्यकाळ पूर्ण झाला नसेल तरीही बदली करण्याचा हक्क शासान अधिकारात राखीव आहे. मात्र यापैकी कुठलेच संयुक्तिक कारण नसेल तर झालेली बदली षडयंत्राचा भाग, सुड उगविण्याचा प्रयत्न अशा जातकुळीत नोंदवली जाते, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अशा सुड उगविणाऱ्या बदल्या अधूनमधून होत असतात. धुळ्याचे पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांची अवेळी झालेली ही बदलीही या सुड उगविण्याच्या जातकुळीतील आहे असा संशय व्यक्त होऊ लागल्याने समाज माध्यमांसह प्रसार माध्यमांवरही या बातमीने जागा व्यापली आहे. धुळ्याच्या पोलीस अधिक्षकांची बदली सुड उगविण्यासाठी झाली असे का बोलले जाते? कुणी घेतला हा सुड? प्रत्येकाला पडलेल्या या प्रश्नांच्या उत्तरासाठी पोलीस अधिक्षक म्हणून संजय बारकुंड यांनी पदभार स्वीकारल्यापासून बदलीचा आदेश हाती पडेपर्यंत केलेल्या कामकाजाचा धांडोळा घेणे अपरिहार्य आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरात दुर्दैवी प्रसंग ओढावला तर स्वतः भेट देऊन आवश्यक ती सर्व मदत देऊ केली, व्यक्तीगत आणि प्रशासकीय अडचणीत पाठीशी उभा राहणारा अधिक्षक कुटूंब प्रमुखाच्या भुमिकेत जिल्हा पोलीस दलाने अनुभवला. त्यातून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद जिल्हा पोलीस दलाच्या मनावर ठसठशीतपणे बिंबले आणि त्याचा सकारात्मक परिणाम कार्यक्षमतेवर झाला, आणि मग जिल्ह्यात कायदा सुव्यस्था राबविण्यात या कार्यक्षमतेचा पुरेपुर वापर पोलीस अधिक्षकांनी करून घेतला. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राबवितांना पारदर्शकपणा जीवंत ठेवला. पोलिस यंत्रणा धनदांडग्यांची, प्रतिष्ठीतांची बटीक आहे ही सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेली भावना दुर केली, राजकारण्यांच्या हातचे बाहले न बनता भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू होतांना घेतलेली शपथ पुर्णत्वास नेण्यासाठी कुठलीही किंमत मोजण्याची तयारी ठेवली. धुळे जिल्हात प्रचंड व्याप्ती असलेल्या पोलीस यंत्रणेचा प्रमुख म्हणून काम करतांना मोठी आव्हाने समोर होती. परराज्यातून परजिल्ह्यातून होणारी अवैध मद्य, गुटखा तस्करी, गोवंशाची तस्करी रोखतांना या आव्हानांचा त्यांनी लिलया सामना केला. खरेतर या एक वर्षाच्या कार्यकाळात पोलीस अधिक्षकांचे काम व्यापक समाजहितासाठी पोषक आहे. मग दुखावले कोण? आनलाईन जुगार चालविणारे आणि त्यांचा राजाश्रय ? अवैध मद्य तस्कर आणि त्यांना पाठबळ देणारे पुढारी? गुटखा तस्कर आणि त्यांच्या कमाईवर अलिशान गाड्यांच्या कर्जाचे बँक हप्ते भरणारे खादीधारी? की गाईच्या रक्तावर आपले संसार थाटणारे कथित प्रतिगामी पुरोगामीत्वाची शाल पांघरणारे पांढरे बगळे? असा सवाल सामान्य जनतेला छळत आहे. संजय बारकुंड जिल्ह्यासाठी वर्षा दोन वर्षाचे पाहूणे आहेत. आज नाही तर उद्या ते जाणार आहेत, मात्र अशा प्रकारच्या सुड उगविणाऱ्या बदलीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होते. नितीधैर्य खचते, संजय बाळकुंड यांचे उत्तराधिकारी म्हणून कधीतरी कुणीतरी येणार आहे त्या अधिकाऱ्यांच्या मनावर या बदलीचा काय परिणाम होईल, मुक्तपणे तो अधिकारी काम करू शकेल का? त्यांनीही कुणाच्या तरी तस्करी हातातील बाहले बनून काम करायचे का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहील.