नाशिक प्रतिनिधी
कालपर्यंत अगदी फुटकळ असलेले मटकामालक आज लाखोपती झालेत. लोकांना ओपन क्लोजच्या आशेवर बसवायचे व त्यांच्या खिशातील पैसे काढून आपले खिसे भरायचे हे त्यांचे कर्तृत्व हे करताना हप्त्याच्या जोरावर सर्व यंत्रणांना गप्प बसवायचे हे त्यांचे कौशल्य नैतिकदृष्ट्या समाजात शून्य किंमत; पण जणू काही हे फार महत्त्वाचे गुन्हेगार असल्यासारखे रोज त्यांची चर्चा चालू आहे. त्यांना हद्दपार कसे करायचे, यासाठी डोक्याला डोकी लावून अधिकारी बसले आहेत. वास्तविक या मटकामालकांना जेरीस आणायचेच ठरवले तर पोलिसांना तासाभराचा अवधी पुरेसा आहे; पण मटका बंदबरोबरच हप्ता बंद झाला नाही तर मटकामालक कधीच हद्दपार होणार नाही, अशी नाशिक जिल्ह्यातील स्थिती आहे.त्यामुळे पहिल्यांदा हप्ता बंद मग तासाभरात मटका बंद करणे शक्य आहे. जिल्ह्यातले सर्व पोलिस अजिबात नाही; पण ठराविक पोलिसांना, काही अधिकाऱ्यांना मटक्याची, त्याच्या मालकांची, त्यांच्या अड्ड्याची नस आणि नस माहीत आहे. त्यांच्यावरच मटका बंदची जबाबदारी देण्याची गरज आहे. कारण या ठराविकांनीच मटका बंद करायचे ‘मनावर’ घेतले तर मटका बंद होणार आहे पण आज स्थिती अशी आहे, की मकटामालक टीव्ही चॅनेलवर पुढे येऊन, कोण किती हप्ता घेतो, हे जाहीर सांगत आहेत. मटका बंद राहूदेच पण त्या मटकामालकाला ‘तू असे बोलू नको’ असे सांगायचे नैतिक धाडस पोलिसांत उरलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे ठराविक पोलिस व काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता चक्क फुटकळ मटकामालकांना हद्दपार करायच्या कारवाईसाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांना बैठका घ्यायची वेळ आली आहे