तीन दिवसात अनुपस्थित वारसांना कागदपत्रे सादर करण्यास मुदत
नाशिक प्रतिनिधी
जिल्हा परिषद सेवेतील मयत कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासाठी शैक्षणिक अहर्ता व इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते, सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेतील अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील वारसांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी कै. कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत कागदपत्रे पडताळण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने एकूण प्रतीक्षा यादीतील ७२ वारसांपैकी बुधवारी ७० अनुकंपा धारकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली, यातील २ वारस हे अनुपस्थित होते. गत वर्षात जिल्हा परिषदेने १२५ दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्यात आले. त्याचबरोबर ६ वारसांना शैक्षणिक अहर्तेनुसार गट ड संवर्गातून गट क संवर्गात सामावून पदस्थापना देण्यात आली. बुधवारी जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात जिल्हा परिषद अनुकंपा प्रतीक्षा सूचितील वारसांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर जे वारस अनुपस्थित होते व ज्या वारसांच्या कागदपत्रांमध्ये अपूर्तता आहे अशा वारसांना ३ दिवसांचा अवधी हा देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. यावेळी पडताळणी समितीतील सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनाली भार्गवे, निवृत्ती बगड, शाखा अभियंता राजेंद्र मोरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, अनिल दराडे, भूषण भार्गवे, चंद्रशेखर पाटील, लघुलेखक साईनाथ ठाकरे, वरिष्ठ सहाय्यक सतीश बच्छाव, वरिष्ठ सहायक राहुल देवरे, कनिष्ठ सहायक शितल शिंदे, यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते.