सुरगाणा प्रतिनिधी
अंबाठा ते पिंपळसोंड हा रस्ता तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तो मंजूर आहे असे म्हटले जाते.सदर रस्ता हा अत्यंत खराब असून धोकेदायक बनला आहे.पावसाळ्यात तर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण होत असते या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले असून “खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हेच समजत नाही. रस्ता खराब असल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.जीव मुठीत धरून वाहनातून प्रवास करावा लागतो.या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे एखाद्या गर्भवती महिलेस प्रसुती करीता दाखल करायचे असेल तर खड्ड्यातून प्रवास करावा लागत असल्याने नवजात अर्भक वाचेल की नाही याची काळजी नातेवाईकांना वाटते. खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो या परिसरातील अंबाठा, डोल्हारे,सुभाषनगर, रानविहीर, खुंटविहीर,मालगोंदा, उंबरपाडा(पि),गोंणदगड,मोहपाडा,उदालदरी,झारणीपाडा, उंबरघोडा,गाळबारी,चिंचमाळ, बर्डा अशी वीस ते पंचवीस वाडे, पाडा,वस्ती आहेत. हि गावे अतिदुर्गम भागात असून गुजरात सीमेवरील आहेत.तालुक्याशी याच रस्त्याने जोडली जातात. खुंटविहीर येथे शासकीय आश्रम शाळा असून या आश्रम शाळेत सहाशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यांचा आरोग्यसेवेचा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे खुंटविहीर येथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो.या खराब रस्त्यामुळे व्यापारी वर्ग येण्यास नाखूष असतात. मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने सरकार कर्मचारी काम करण्यास तयार नाहीत.हा सिमावर्ती भाग कित्येक वर्षापासून अविकसित व दुर्लक्षित आहे.विकासापासून कोसो दूर आहे या भागाकडे राज्य शासनाचे तसेच राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.सदर रस्ता हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर आहे असे वारंवार सांगितले जाते मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही याबाबत दोन दीड महिन्यापूर्वी’ आम्हाला गुजरातला जोडा, असा उठाव याच सीमावर्ती भागातील पिंपळसोड, खुंटविहीर या भागातील जनतेने केला होता. तातडीने सुविधा पुरवल्या जातील असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. हे काम येत्या पंधरा दिवसात सुरु केल्यास एकोणीस डिसेंबर पासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा खुंटविहीरचे सरपंच आनंदा झिरवाळ यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.