बोरगांव प्रतिनिधी
सुरगाणा तालुका परिसरात सकाळी पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. परंतु, रविवारी (दि.२६) दुपारी पावणेतीन वाजता बेमोसमी पावसाने पंधरा ते वीस मिनिटे हजेरी लावल्याने बळीराजा शेतात कापून ठेवलेल्या भात पिक जमा करावयाची लगबगीत होता. अस्मानी अन् सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाने मागील नुकसानीचे दुःख विसरून जोमाने नवे पिक उभे केले होते. शेतात तयार झालेले भाताची कापणी करून उघड्यावर शेतातच पडलेले आहे. परंतु, वातावरणातील बदल पाहून बळीराजा चे तोंडचे पाणी पळाले आहे. रविवारी दुपारी पावसाने पंधरा ते वीस मिनिटे हजेरी लावल्याने शेतात कापून ठेवलेल्या भात पिक व जनावरांसाठी लागणारा चारा झाकण्यासाठी धावाधाव करावी लागली. या बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील भात, नागली, वरई, टोमॅटो, घेवडा, स्ट्रॉबेरी या पिकांचे मोठ्या नुकसानीचा अंदाज व्यक्त होत आहे.